मध्य प्रदेशातील एकाहून एक सरस ठिकाणांची सैर आपण सध्या ‘करू या देशाटन’च्या माध्यमातून करत आहोत. गेल्या वेळी आपण ग्वाल्हेरमध्ये फेरफटका मारला. आजच्या भागात फिरू या ओरछा नगरीमध्ये.
.............
ओरछा हे आवर्जून पाहावे असे बुंदेलखंडातील झाशीजवळील एक ठिकाण, मध्य प्रदेश राज्याच्या टिकमगड जिल्ह्यात आहेत. ओरछा या शब्दाचा अर्थ गुप्त ठिकाण असा होतो. प्रेम, मैत्री, त्याग, विरक्ती, श्रद्धा, वैभव, कलासक्ती, सौंदर्य यांनी ओतप्रोत भरलेल्या ओरछा नगरीबद्दल केवळ वाचण्यापेक्षा ती प्रत्यक्ष पाहत, तेथे रचल्या गेलेल्या कट कारस्थानांच्या कथा ऐकण्यात खरी गंमत आहे. याचे वर्णन करण्यास शब्द अपुरे आहेत. तरीही आपण या नगरीची थोडी ओळख करून घेऊ या, जेणेकरून तिथे प्रत्यक्ष भेट दिल्यास ठिकाणाची पार्श्वभूमी कळू शकेल.
बेतवा नदीच्या काठावर वसलेले ओरछा म्हणजे वास्तुरचनाकारांसाठी आदर्शवत असे ठिकाण आहे. येथे अनेक महाल, मंदिरे असून, या ठिकाणाला साहजिकच इतिहासाची पार्श्वभूमीही आहे. या गावात वास्तूंशी निगडित अनेक कथा सांगितल्या जातात. त्या ऐकण्यासाठी व महाल पाहण्यासाठी तेथे जाणे आवश्यक.
इतिहास : गुर्जर प्रतिहार सम्राट मिहिर भोज याने आठव्या शतकात हे गाव बसविले. इ. स. १५०१मध्ये राजा रुद्रप्रतापसिंह याने ओरछा या राज्याची स्थापना केली. अबुफजलला अकबराने त्याचा मुलगा सलीम याला काबूत आणण्यासाठी पाठविले होते. त्या वेळी राजा वीरदेवसिंह याने सलीमला मदत केली होती. तेव्हापासून वीरदेवसिंह आणि सलीम मित्र झाले आणि सलीमने ओरछाची धुरा वीरदेवसिंहाकडे दिली. आता तेथील काही ठिकाणांबद्दल पाहू या.
चतुर्भुज मंदिर : किल्ल्याच्या बाहेरील बाजूला इसवी सन १५५८ ते १५७५ या कालावधीत हे मंदिर श्रीराम मंदिर म्हणून उभारले गेले होते. मधुकर शाह याने या मंदिराच्या कामाला सुरुवात केली आणि त्याचा मुलगा वीरसिंह याने ते पूर्ण केले. मधुकर शहा हा कृष्णभक्त होता, तर त्याची राणी गणेशकुवारी रामभक्त होती. मंदिराचे काम चालू असताना ती अयोध्येला गेली होती आणि तेथून तिने रामाची एक मूर्ती स्थापनेसाठी आणली. परंतु मंदिर पूर्ण व्हायचे होते. म्हणून ती मूर्ती तात्पुरती एका महालात ठेवण्यात आली. मंदिर पूर्ण झाल्यावर राममूर्ती तिथून हलविण्याचा प्रयत्न करण्यात आला; मात्र ती हलेना. अखेर ती तिथेच ठेवण्यात आली. विटा आणि चुन्यातील बुंदेली शैलीत बांधलेले हे मंदिर बहुमजली असून, एका महालासारखे बांधण्यात आले आहे. १५ फूट उंचीच्या चबुतऱ्यावर हे पाच मजल्यांचे मंदिर उभारले आहे. त्याची उंची १०५ मीटर (३४४ फूट) आहे. ६७ पायऱ्या चढून मंदिरापर्यंत जाता येते. ओरछामधील हे प्रमुख आकर्षण आहे.
जहांगीर महाल : हा तीन मजली महाल मुघल व ओरछा शासकांच्या मैत्रीचे प्रतीक म्हणून ओळखला जातो. १५१८मध्ये याची निर्मिती झाली. सलीमच्या स्वागतासाठी हा महाल बांधण्यात आला होता. याच्या पूर्व दरवाज्यातून अतिशय मनोहर दृश्य दिसते. डोंगराच्या पार्श्वभूमीवर वाहणारी बेतवा नदी निसर्गाचेही सुंदर दर्शन घडविते. या महालाच्या चारही बाजूंनी तोफखाना आहे. आत एका पाठोपाठ एक अनेक खोल्या आहेत. तळघरेही आहेत. महालाच्या प्रवेशद्वारावर दोन मोठे झुकलेले हत्ती आहेत.
लक्ष्मीनारायण मंदिर : १६२२मध्ये वीरसिंह याने ओरछा गावाच्या पश्चिमेच्या डोंगरावर हे मंदिर बांधले. त्यात १७व्या व १८व्या शतकातील काही चित्रे आहेत. झाशीच्या राणीची लढाईतील काही दृश्येही त्यात चित्रित केली आहेत.
राजाराम मंदिर : हे एकमेव असे मंदिर आहे, की जेथे श्रीरामाची राजा म्हणून पूजा केली जाते. चतुर्भुज मंदिराचे काम चालू असताना राणीने आणलेली मूर्ती तात्पुरत्या स्वरूपात येथे ठेवली होती. चतुर्भुज मंदिराचे काम पूर्ण झाल्यावर तेथे मूर्ती नेण्यासाठी सुरुवात झाली; पण मूर्ती जागची हलेना. त्यामुळे ती येथेच ठेवण्यात आली.
राजमहाल : मधुकर शहाने याची निर्मिती केली. हा महाल चित्रकलेसाठी प्रसिद्ध आहे. तेथे धार्मिक चित्रेही आहेत.
राय प्रवीण महाल : हा महाल राजा इंद्रमणीने आपली प्रेयसी राय प्रवीण हिच्यासाठी बांधला होता. ती अतिशय सुंदर होती आणि कवयित्रीही होती.
अकबराला तिच्याबद्दल माहिती कळताच तिला त्याने दिल्लीला येण्याचा हुकूम दिला; पण तिचे इंद्रमणीवर प्रेम आहे असे कळताच तिची परत पाठवणी करण्यात आली. या महालाच्या भोवताली सुंदर बागाही आहेत.
फुलबाग : हे ठिकाण चारही बाजूंनी भिंतींनी बंदिस्त आहे. ते राजांचे विश्रांतीचे ठिकाण होते. सध्या हा एक पिकनिक स्पॉट म्हणून ओळखला जातो. येथे तळघर असून, एक महालही आहे.
सुंदरमहाल : राजा झुंजारसिंहाचा मुलगा धुरभजन याच्यासाठी हा महाल बांधण्यात आला. त्याचे एका मुस्लिम तरुणीवर प्रेम होते. विवाहानंतर त्याने मुस्लिम धर्म स्वीकारला. हळूहळू त्याने शाही जीवनाचा त्याग केला आणि तो भक्तिमार्गात रममाण झाला.
हरदौलची बैठक : राजा झुंजारसिंह मुघल दरबारात व्यग्र असताना त्याचा भाऊ हरदौल ओरछाचा कारभार पाहत असे. त्याचे त्याच्या भावजयीवर मातृवत प्रेम होते. या बाबतीत अनेक कथा प्रचलित आहेत. त्याच्यावर विषप्रयोग झाला होता. यासाठी लोक झुंजारसिंहाला दोषी समजतात. हरदौल व राणीच्या कथित अनैतिक संबंधाची चर्चा झुंजारसिंहाच्या कानावर गेल्याने हरदौलचा काटा काढला गेला. हरदौलबाबत त्याचे कान लोकांनी फुंकले असे म्हणतात.
छत्रीस्वरूप स्मारके : बेतवा नदीच्या काठावर सुंदर अशी छत्रीस्वरूप स्मारकेही (समाधी) आहेत. येथील उंटखान्यामधून ओरछा नगरीचे विहंगम दृश्य दिसते. ‘आयआयटी, रूरकी’ने ओरछावर लघुपटही तयार केला आहे.
कसे जायचे?ओरछा हे ठिकाण झाशीपासून २० किलोमीटर अंतरावर आहे. झाशी-ओरछा-खजुराहो अशी बस वाहतूक सतत चालू असते. जवळचे विमानतळ ग्वाल्हेर आणि खजुराहो येथे असून, झाशी व खजुराहो येथे रेल्वे स्टेशन्स आहेत.
खजुराहो, झाशी, ओरछा, ग्वाल्हेर, शिवपुरी आणि शक्य असेल तर कलिंजर किल्ला अशी सहल रेल्वेने प्रवास करून तीन ते पाच दिवसांत होऊ शकते. सर्व ठिकाणी राहण्याची सोय आहे.
- माधव विद्वांसई-मेल : vidwansmadhav91@gmail.com
(लेखक हौशी आणि अभ्यासू पर्यटक आहेत.)
(ओरछा नगरीची झलक दर्शविणारा व्हिडिओ सोबत देत आहोत.)